कोणताही पक्ष लोकशाहीवर चालतो, कोणाच्या घरावर नव्हे; राज्यसभा हुकली, भुजबळ बरंच बोलले

मुंबई: कोणताही पक्ष लोकशक्तीवरच चालतो. राजकीय पक्ष कोणाच्या घरावर चालत नसतो, अशा शब्दांत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली. छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते. पण सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्यानं त्यांची संधी हुकली. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतर अवघ्या १० दिवसांत सुनेत्रा पवारांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी अनेक जण उत्सुक होते. भुजबळांना राज्यसभेवर काम करण्याची इच्छा होती. पक्षातील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक असल्यानं त्यांचा दावा प्रबळ मानला जात होता. पण पक्षाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांना संधी देण्यात आली. त्यावर भाष्य करताना राजकारणात असं चालतंच असतं. आपण बघत राहायचं असं किती दिवस चालतंय ते. लोकही सगळं बघत असतात. कोणताही पक्ष लोकशाहीवर चालतो. तो कोणाच्या घरावर किंवा घराण्यावर चालत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया भुजबळांनी सध्याच्या घडामोडींवर ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
अनेक महत्त्वाकांक्षी विधेयकं बासनात, मोदी सरकार ट्रॅक बदलणार, कोणकोणते विषय थंडबस्त्यात?
राज्यसभेवर संधी न दिल्यानं नाराज आहात का, असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर राजी-नाराजीचा प्रश्न आहे. पण मी पक्षात सर्वात ज्येष्ठ आहे, याची आठवण करुन दिली. ‘माझ्या प्रदिर्घ अनुभवाचा दिल्लीत नक्कीच फायदा झाला असता. पक्षाची बाजू मांडणं असो वा राज्यातले प्रश्न मांडणं, त्यांची सोडवणूक करणं असो. अशा वेळी प्रतिमा, अनुभव यांचा नक्कीच विचार होत असतो. संसदेत शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते समोर असणार. तिथे नवख्यांचा निभाव लागेल का सारा विचार करुनच मी दिल्लीला जाण्यास इच्छुक होतो. पण तसं झालं नाही. तूर्त आपण बघत राहायचं,’ अशा शब्दांत भुजबळांनी सुनेत्रा पवारांच्या अनुभवाच्या कमतरतेवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’कडून झाली. त्यावर इथे आमच्यामुळे नुकसान म्हणत असाल तर उत्तर प्रदेशात, राजस्थानात काय झालं, तिथे आम्ही कुठे होतो, असे प्रतिप्रश्न भुजबळांनी विचारले. भाजपनं ४०० पारची घोषणा दिल्यानं संविधान बदलाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे मागासवर्गीय भाजपपासून दूर गेलेच, शिवाय ओबीसीसुद्धा भाजप, युतीपासून दूर गेले. मुस्लिम तर सोबत नव्हतेच. तीन मोठे समाज घटक सोडून गेल्याचा फटका महायुतीला बसला, असं विश्लेषण त्यांनी केलं.