काही लोकं फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले; डॉ. कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात

जुन्नर (पुणे) प्रशांत श्रीमंदिलकर : शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे नुकतीच डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते असा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत ७० पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत, ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले. कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार ? कोणते कंत्राट कधी निघणार ? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की, माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात केला आहे.

होय शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा, आमचा आत्मा शेतकऱ्यांसाठी भटकतो; मोदींच्या टीकेवर कोल्हेंचा पलटवार

२०१९ साली जेव्हा मी संसदेत मी निवडून गेलो; तेव्हा मी नवीन होतो म्हणून मी माहिती घेतली की, यापूर्वी खासदार असलेल्या महोदयांनी नेमके संसदेत कोणते प्रश्न विचारले आहेत. तेव्हा समजलं की, काही लोकं केवळ आपला व्यवसाय करण्यासाठी संसदेत गेले.शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा, असा सवालही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले असल्याचे पुन्हा खासदार डॉ. अमोल कोल्हे नमूद केले.