काँग्रेसचा गेम, पुन्हा मते फुटली, दादांचा सेफ गेम, नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध कामाला आले!

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धोबीपछाड दिला आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र आश्चर्य म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक मते नसतानाही ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या संबंधाच्या जोरावर विजय मिळवला. लोकसभा निकालामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या महायुतीला विधान परिषदेच्या निकालाने पुन्हा विजयाची चव चाखायला मिळाली आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीची मोहीम यावेळीही फत्ते केली. कारण काँग्रेसचे सात ते आठ मते फुटल्याचे निकालातून समोर येत आहे.

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान झाले तसेच तासाभरात मतमोजणी देखील पार पडली. विधानसभेच्या २८८पैकी २७४ सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले. अंतिम निकालानुसार भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले.
Vidhan Parishad Election : आमदारांवर डाऊट, कोण होणार आऊट! विधान परिषद निवडणुकीत कुणाची होणार फाटाफूट?

महायुतीचा विजयी झेंडा, मविआला धक्का!

भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार निवडून येतील एवढी मते त्यांच्याकडे होती. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांना काही मतांची जुळजुळव करावी लागणार होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आपले आमदार एकसंध ठेवण्यात एकनाश शिंदे आणि अजित पवार यांना यश मिळाले. विधान परिषद निवडणुकीत शरद पवार हे अजित पवार यांच्याकडील आमदारांची मते खेचून त्यांना धक्का देतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन अजित पवार यांनी निवडणुकीचे परफेक्ट नियोजन केले, त्याचा परिपाक अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यात झाला. दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सर्वपक्षीय संबंधाच्या जोरावर आमदार बनले. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांनीही विजय संपादन केला. मात्र काँग्रेस आमदारांची ७ ते ८ मते फुटल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत देखील काँग्रेसची काही मते फुटली होती.

राज्यातले ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ जोमात!

दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. यावेळी सर्वच पक्षांना मतफुटीचा धोका संभवत होता. त्यामुळे भाजपने आपल्या आमदारांना मुंबईतील कुलाब्यातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदारांना परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये ठेवले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सांताक्रुजमधील ललित हॉटेलमध्ये मुक्कामी होते. शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार हॉटेल ताज लँड एंड्समध्ये मुक्कामी होते. राजकीय पक्षांनी आपले आमदार विरोधकांच्या गळाला लागू नये, यासाठी पुरेपूर बंदोबस्त केला होता.