काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पुणे तुंबले; पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुंटल्याने पुराचा धोका, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पुणे : महापालिका प्रशासनाने विस्तारलेले अशास्त्रीय रस्त्यांचे जाळे, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळात बांधलेले काँक्रिटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन पुणे ‘पाण्यात’ जाण्यास कारणीभूत ठरले आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी प्रशासनाने अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसावर खापर फोडले आहे. प्रत्यक्षात मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे शहरात पुराचा धोका वाढल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

– पाण्याचे मार्ग रोखल्याचा फटका


पावसाचे पडणारे किमान ३५ टक्के पाणी जमिनीत मुरणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या काँक्रिटीकरणाच्या हव्यासामुळे पावसाच्या पाण्याचे भूगर्भात जाण्याचे सर्व मार्ग रोखल्याने ९५ टक्क्यांहून अधिक पाणी वाट मिळेल तिकडे वाहत जाते, असे अभ्यासक कानीकपाळी ओरडून सांगत आहेत. नैसर्गिक जलस्रोत बुजवल्याने डोंगरउतारावरून येणारे पाणीही रस्त्यावर येते. सोयीस्कररीत्या वळवलेले नाले, राडारोडा टाकून बुजवलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पाणी वाहण्यात अडथळे येत आहेत.

Vegetables Price : भाज्यांचा तोरा कायम! आवक वाढूनही भाज्या महाग? जाणून घ्या आजचे दर काय?

– नालेसफाईचा दावा फोल

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासन यंदाही करण्यास विसरले नाही. मात्र, गेल्या आठवड्यात कात्रज, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, येरवडा, वडगाशेरी आणि हडपसरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेचा दावा फोल असल्याचे सिद्ध झाले. शहरातील बहुसंख्य मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. शिवाय अनेक सोसायट्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. नाल्यांवर बांधलेल्या भिंतीही काही ठिकाणी कोसळल्या.

– पदपथांवर सिमेंटचा ‘स्मार्ट’ वापर

‘स्मार्ट सिटी’च्या नियोजनानुसार, गेल्या दहा वर्षांत महापालिकेने शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. अगदी गल्लीबोळांतही काँक्रिटचे रस्ते आहेत. पावसाचे पाणी झिरपण्यासाठी पदपथांवर पेव्हर ब्लॉक टाकण्याचे पालिकेने ठरवले. मात्र, कंत्राटदारांनी बहुतांश पदपथांवर ब्लॉकच्या खाली सिमेंटचा जाड थर दिला. त्यामुळे पेव्हर ब्लॉक असूनही पावसाचे पाणी झिरपत नाही, अशी स्थिती आहे. रस्ता आणि पदपथाच्या मधील पाणी वाहून नेणारे खंदकही बघायला मिळत नाहीत. परिणामी पावसाचे पाणी उताराच्या दिशेने वाहते किंवा सखल भागात साठते.

– ‘शहरातील तीनशे जलस्रोत भूमिगत’

अशास्त्रीय दृष्टिकोनातून झालेल्या बांधकामांमुळे पूरप्रवण क्षेत्रे वाढल्याचा निष्कर्ष जलस्रोत आणि भूगोल अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांच्या संशोधनातही पुढे आला आहे. शहरीकरणामुळे गेल्या तीन दशकांत शहरातील तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत बुजवल्याचे त्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. सन १९९१ ते २०१६ या कालावधीतील रामनदी, आंबिल लोढा, वाघोली, वडकी, नांदोशी, भैरोबानाला येथे मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आले. काही ठिकाणी ओढ्यांची लांबी, रुंदी कमी करण्यात आल्याचे निरीक्षणही या अहवालात मांडण्यात आले आहे.

रस्त्यांच्या रचनेत उतारांचा विचार न केल्यामुळे शहरात दर वर्षी अनेक ठिकाणी पाणी साचते. नैसर्गिक नाले आणि प्रवाह अनेकदा अडवले जातात. त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाणी जमिनीत न झिरपता पृष्ठभागावर साचते. पावसाचे ३० ते ३५ टक्के पाणी जमिनीत झिरपणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच पावसाळ्यातील रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

– डॉ. श्रीकांत कार्लेकर, ज्येष्ठ भूगोल अभ्यासक

मुख्य रस्त्यांबरोबरच गल्लीबोळातील पदपथांलगतच्या मोकळ्या जागाही प्रशासनाने बंद केल्या. पाणी मुरण्याच्या जागाच नसल्याने पावसाचे जमिनीवर पडणारे ९५ टक्के पाणी वाहून जाते. रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर ते बुजवताना रस्ता उंच आहे की सखल, याचा विचारच होत नाही. गेल्या दोन वर्षांत कमी वेळेत शहरात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दर वर्षी पाणी साठत असलेल्या चौकांमध्ये पाणी मुरण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.

– डॉ. श्रीकांत गबाले, जलस्रोत आणि भूगोल अभ्यासक

पूरस्थिती येणारी शहरातील संभाव्य ठिकाणे

बालाजी कॉलनी, सूस रस्ता, बालाजीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर पेट्रोल पंप, भुसारी कॉलनी, बंडगार्डन, दांडेकर चौक, दीपबंगला चौक, संतोष हॉल चौक, शंकर महाराज मठ, सिंहगड रस्ता जंक्शन, श्रीधर कॉलनी (हिंगणे), कर्वे पुतळा, कुसार बाग(कोंढवा), मार्केट यार्ड, मंडई, मित्र मंडळ, सुतारवाडी (पाषाण), वारजे पुलासह ६१ ठिकाणे पूरप्रवण क्षेत्रात मोडतात.