एकेकाळचे कट्टर शिवसैनिक, अनिल देसाई अन् राहुल शेवाळे आमने-सामने, दक्षिण मध्य मुंबईत काय होणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सूर टिपेला पोहोचला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य आठ दिवसांनंतर मतदानयंत्रात बंद होईल. संमिश्र मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकेकाळचे स्नेही आणि कट्टर शिवसैनिक निवडणुकीमध्ये आमने-सामने आहेत.शिवसेना पक्षफुटीनंतर बदलेल्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, महाआघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांचा सामना शिवसेनेचे, महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांच्यासोबत होणार आहे. प्रशासकीय कामकाजावर पकड असलेले ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे राजकीय रणनितीकार मानले जातात. ‘ग्राउंड’वर काम करून हा मतदारसंघ बांधलेल्या शेवाळे यांच्याशी त्यांना लढत द्यायची आहे. देसाई आणि शेवाळे एकमेकांचे स्नेही. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना एकमेकांची बलस्थाने आणि मर्यादा यांची पूर्ण कल्पना आहे. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघामध्ये या कट्टर शिवसैनिकांची रणनीती कशी असेल, यावर मराठीसह इतर समाजांच्या मतांचा टक्का कसा फिरतो, याचे गणित ठरेल.
Pune Loksabha: पुण्यात आज मतदान; शिरुर, मावळसह राज्यात ११, तर देशात ९६ जागांवर मतदान

येथून दोनदा विजयश्री खेचून आणलेल्या शेवाळे यांच्यासाठी ही ‘हॅटट्रिक’ची संधी असेल, अशी चर्चा ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होती. आता मात्र ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतील फुटीमुळे दुखावलेल्यांची ठसठस मतपेटीमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेशी भावनिक ऋणानुबंध असलेला मतदारसंघ. शिवसेनेची पक्षबांधणी, मराठी माणसाच्या हक्काची लढाई, सेना भवन अशा मराठी अस्मितेच्या ठाशीव खुणा मुंबईकरांच्या मनामध्ये कोरलेल्या आहेत. धारावीसह दक्षिण मध्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन देत राहुल शेवाळे मतदारसंघ पिंजून काढत आहे. तर देसाई यांनी प्रशासकीय रणनीती बाजूला ठेवत, मराठी रहिवासी अधिक असलेल्या भागांत खुंटा बळकट करण्याची भूमिका घेतली आहे.

१९८९ ते २००९ ही २० वर्षे शिवसेनेने हा गड राखला. मोहन रावले सलग पाच निवडणुकांमध्ये येथून विजयी झाले. २००९मध्ये काँग्रेसने ही जागा परत मिळाली. २०१४च्या मोदीलाटेत ही जागा पुन्हा शिवसेनेकडे गेली. राहुल शेवाळे यांनी येथे विजय मिळवला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना चार लाख २४ हजार ९१३, तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना दोन लाख ७२ हजार ७७४ मते मिळाली होती. शेवाळे यांनी दीड लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. २०१४मध्ये शेवाळे यांना तीन लाख ८१ हजार आठ, तर गायकवाड यांना दोन लाख ४२ हजार ८२८ मते पडली होती.

हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा. दादर, माहीम, सायन-कोळीवाडा, अणुशक्ती नगर, चेंबूर, मानखुर्द, वडाळा, धारावी असा विस्तीर्ण पसरलेला. एकीकडे धारावीसारखी झोपडपट्टी, तर दुसरीकडे दादर, माहीमसारखा पांढरपेशी सुसंस्कृत मतदार, चेंबूरमधला मध्यमवर्गीय, तर तामिळ, तेलगु ,कन्नड, मुस्लीम, दलित मतदारांना सामावून घेतलेला मानखुर्द, धारावीचा मोठा भाग. या मतदारांच्या जगण्याच्या गरजा अन् अस्तित्व टिकवण्याची लढाई कडवी आहे. या निवडणुकीमध्ये धारावी पुनर्विकासाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.

हा संमिश्र मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेतला अवघड पेपर मानला जातो. मराठी, तामिळ, तेलगु, मुस्लीम, दलित, अल्पसंख्यक, कोळी, शीख अशी संमिश्र लोकवस्ती येथे आहे. मुस्लिम मतदारांच्या आशा-अपेक्षांबद्दल खुली चर्चा होताना दिसत नाही. मुस्लिम, अल्पसंख्यकांची एकगठ्ठा मतपेढी ‘गेमचेंजर’ ठरू शकते. शेवाळे यांनी मुस्लिमांसाठी अनेक विधायक कामे केल्याचा दावा केला असला, तरी भाजपला विरोध म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मते फिरण्याची शक्यता वर्तवली जाते.

शिवसेना उबाठा, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी धारावीला विशेष महत्त्व आहे. लाखोची लोकवस्ती असलेल्या या भागात राजकीय पक्षांसाठी एकगठ्ठा ‘व्होटबँक’ येथे आहे. २००९मध्ये या मतदारसंघात विजय मिळवलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या, वर्षा गायकवाड यांच्यासाठी धारावी हा हळवा कोपरा आहे. येथून उमेदवारी न मिळाल्याची नाराजी त्यांच्या मनात असली, तरी त्यांनी धारावीमध्ये अनिल देसाई यांच्यासाठी आपले नेटवर्क कामाला लावले आहे. शीव-कोळीवाड्यात भाजपचे आर. तमिळ सेल्वन, वडाळ्यातून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, तर माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय महायुतीचे पारडे जड आहे.

दोन्ही पक्षांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. ‘शिवसेना आमचीच’ हा आवाज दोन्हीकडून बुलंद असला, तरीही मतदार कोणत्या शिवसैनिकाच्या गळ्यात विजयाची माळ घालतो, याबाबत उत्सुकता आहे.
‘मोदींची पावले हुकूमशाहीच्या दिशेने’, कल्याणमधील सभेत शरद पवार यांचे जोरदार टीकास्त्र

गाफील मतांचा महायुतीला फायदा?

ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे चिन्हबदलामुळे निर्माण झालेले आव्हान कायम आहे. मतदारांच्या मनांवर मशालीचे चिन्ह बिंबवले, तरी धाकधूक कायम आहे. चिन्हामुळे गफलत झालेल्या मतदारांची मते शेवाळेंच्या पारड्यात झुकण्याची शक्यता वर्तवली जाते. मनसेचे ‘होम पीच’ असलेल्या दादर, माहीम, शिवाजी पार्कमधील मनसैनिक शेवाळेंसाठी कामाला लागले आहेत. मनसेचा महायुतीला पाठिंबा असला, तरीही त्याचे मतामध्ये किती परिवर्तन होईल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

राहुल शेवाळे
मागील १० वर्षे येथील खासदार असलेले शेवाळे यांचे ‘ग्राउंडवर्क’, धारावीकरांसह मराठी मतदारांचे गृहस्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. विधानसभा आमदारांचे बळ त्यांना मिळणार आहे.

अनिल देसाई
उत्तम प्रशासकीय पकड असलेले देसाई मराठी रहिवासी अधिक असलेल्या भागांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा खुंटा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील नेटवर्क, मुस्लिम मते ही अनिल देसाईंसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

२०१९मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

राहुल शेवाळे (शिवसेना) ४ लाख २४ हजार९१३

एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस) २ लाख ७२ हजार ७७४

मतदारसंघातील आमदार

माहीम सदा सरवरणकर (शिवसेना)

चेंबूर प्रकाश फातरपेकर (उबाठा)

धारावी वर्षा गायकवाड (काँग्रेस)

सायन-कोळीवाडा आर. तमिळ सेल्वन (भाजप)

वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप)

अणुशक्ती नगर नवाब मलिक (राष्ट्रवादी)

मागील निवडणुकांचे निकाल

वर्ष विजयी उमेदवार (मिळालेल्या मतांची टक्केवारी)

२०१९ राहुल शेवाळे (५३.३ टक्के)

२०१४ राहुल शेवाळे (४९.५७ टक्के)

२००९ एकनाथ गायकवाड (४३ टक्के)

२००४ मोहन रावले (३६.९४ टक्के)

१९९९ मोहन रावले (४७.९७टक्के)