उन्हाचा चटका, नेत्यांना धक्का; टळटळीत उन्हात कार्यकर्त्यांची जमवाजमव करताना दमछाक

मुंबई : कार्यकर्त्यांची संख्या जितकी अधिक, तितका प्रचार प्रभावी असे समीकरण ठरलेले असते. मात्र यावेळी राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती, उन्हाचा तडाखा, उन्हाळी सुट्ट्या याचा परिणाम प्रचारावर दिसत असून कार्यकर्त्यांची जमवाजमव करताना उमेदवार, राजकीय पक्ष यांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रचारफेऱ्यांना म्हणावा तितका प्रतिसाद दिसत नसून याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर शिकामोर्तब झाले असून प्रत्येकजण प्रचारातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. जाहिरातबाजी, समाजमाध्यम, मोबाइल संदेश, माहितीपत्रक वाटप ही प्रचाराची माध्यमे असली तरी प्रत्यक्षातील प्रचारफेरीला वेगळे महत्त्व आहे. प्रचारफेरी आणि मतदारांच्या घराघरात पोहोचण्यासाठी गल्लीबोळात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांची गरज असते. प्रत्येक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची दिसणारी गर्दी यावेळच्या निवडणुकीत कुठेच दिसत नाही. यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे राज्यातील सध्याची राजकीय स्थिती असल्याचे एका उमेदवाराच्या प्रसिद्धीप्रमुखाने सांगितले. वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीने युती आणि आघाडी झाली आहे. भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने तळागाळातील कार्यकर्ते मात्र अद्याप दुरावलेले आहेत. युती किंवा आघाडीतील एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात घटक पक्षाचे कार्यकर्ते हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच दिसत आहेत. उमेदवाराला इतर घटकपक्षाची आपल्याला साथ आहे, त्यांचे नेते आपल्यासोबत आहेत हे वारंवार सांगावे लागत आहे. राजकीय अस्थिरतेनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने ही संभ्रमाची स्थिती असल्याचे प्रचारातील एका कार्यकर्त्याने सांगितले.

सध्याचे हवामान कारकर्त्यांची संख्या रोडवण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने कार्यकर्ते, विशेषतः महिला घराबाहेर पडण्यास तयार होत नाहीत. प्रकृती बिघडण्याचे भीतीने उन्हातून फिरण्यासाठी दबाव टाकण्यास उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी धजावत नाहीत. ऐन मे महिन्यात निवडणूक आल्याचा फटका कार्यकर्त्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. बहुतांश कार्यकर्ते, महिला या कुटूंबासह मुंबईबाहेर आहेत. २० मे च्या मतदानापूर्वी दोन दिवसआधी मुंबईत येण्याचे अनेकांनी ठरवले आहे. त्यामुळे हक्काचे कार्यकर्ते मुंबईबाहेर असल्याने उमेदवारांची पंचाईत झाली आहे. परराज्यातील मुंबईत राहणारे अनेकजण प्रचारात असतात. मात्र तेही सुट्टीमुळे मुंबईत नाहीत. कार्यकर्ते कितीही एकनिष्ठ असले तरी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, मानधन तसेच इतर व्यवस्था उमेदवाराला करणे भाग असते. मात्र कामावर दांडी मारून प्रचारात सहभागी होणे परवडत नसल्याने अनेकजण नकार देतात, असे प्रचाराची जबाबदारी असलेला एक नेता म्हणाला.
लंकेंना महाविकास आघाडीतूनच मोठा धक्का; पवारांचा शिलेदार स्वत:च्याच मतदारसंघात अडचणीत
पक्ष दुभंगल्याचा फटका

दोन प्रमुख पक्ष दुभंगल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कोणतीही रणनीती ठरवताना पक्षातील सामान्य कार्यकर्त्याची फळी काम करत असते. त्यांचाच चेहरा मतदारांना परिचित असतो. मात्र पक्ष दुभंगल्यामुळे ही रणनीती आखतानाही फटका बसत आहे.