उद्धवजी, हिंमत असेल तर या प्रश्नांना उत्तरं द्या, जनता वाट पाहतेय! भाजपचे ५ सवाल

मुंबई: नरेंद्र मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भारतीय जनता पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘सामना’ला मुलाखत देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी समाचार घेतला आहे. त्यांनी ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हिंमत असेल तर या प्रश्नांना उत्तरं द्या, असं जाहीर आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं बावनकुळेंनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एसंशिं…! ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला; ‘औरंगजेब फॅन क्लब’वरुन इतिहास काढला, मोदींवर निशाणा
बावनकुळेंनी ठाकरेंना विचारलेले ५ सवाल
१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?
२. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?
३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?
४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?
५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?

हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असं बावनकुळेंनी त्यांच्या पोस्टच्या अखेरीस म्हटलं आहे. आता ठाकरेसेनेकडून बावनकुळेंना काय प्रत्युत्तर देण्यात येणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.