आम्हीही मुंबईकर, मग उपेक्षित का? पाइपलाइन टाकल्यानंतरही येईना पाणी, गोराई गावातील रहिवाशांचा संताप

मुंबई : बोरिवली पश्चिमेला गोराई डम्पिंग ग्राऊंडला लागून गोराई जेट्टी आहे. या जेट्टीवर लागलेल्या बोटींमधून अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासानंतर गोराई गावात जाणाऱ्या जेट्टीवर उतरता येते. मात्र हा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा असला, तरी गोराई गावातील लोकांचे पाण्याअभावीचे जगणे मात्र आपण कोणत्या शतकात आहोत, असा प्रश्न निर्माण करते. शहरी जगण्याचा स्पर्शही गोराई गावामध्ये आहे. मात्र येथे उणीव आहे ती पाण्याची. अफाट पसरलेला समुद्र, शेजारी वाहणारी खाडी या नागरिकांना दिसत राहते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागते.

या गोड्या पाण्यासाठीचा त्यांचा लढा अनेक वर्षे सुरू आहे. आम्हीही मुंबईकर नागरिक आहोत, मग मुंबईकरांना घरोघरी मिळणारे पाणी आमच्या घरापर्यंत अजून का पोहोचलेले नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा संताप अजूनच जास्त तीव्रपणे व्यक्त होतो. निवडणुकीच्या वेळी मते मागायला येणारे नेते निवडून आल्यावर कुठे जातात? किती नेते बोरिवली पश्चिमेलाच असलेल्या गोराई गावामध्ये येतात, गोराई गावामध्ये बंगल्यासाठी जागा घेण्याची त्यांना उत्सुकता असते, पण याच गावामध्ये नेमक्या गैरसोयी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ते इथे फिरतात का, असा या नागरिकांचा प्रश्न आहे. आदिवासी, कोळी, ख्रिश्चन समाज येथे नांदतो. शिक्षण आहे, काहींची दोन मजली घरेही आहेत, तर काही पाड्यांवर आदिवासींचे जगणे मातीच्या सारवलेल्या घरांमध्ये नांदते. घरात सधनता असली किंवा नसली तरी घरात नळाला येणारे पाणी नसल्याने घशाला पडलेली कोरड सर्वत्र सारखीच आहे. गोराई गावाच्या एका दिशेला उत्तनपर्यंत आणि दुसऱ्या दिशेला मनोरीपर्यंत घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. मग गोराईतील पाड्यांवर अन्याय का, असा प्रश्न येथील नागरिक विचारतात.

गोराई गावामध्ये प्रवेश केल्यावर सर्वांत आधी दिसतो तो बिरसा मुंडा पाडा. या पाड्यावरील प्रत्येक घराच्या समोर २०० लिटरचे प्लास्टिकचे ड्रम भरून ठेवलेले दिसतात. या पाड्यासाठी दोन टाक्यांची सोयही करण्यात आली आहे. मात्र या टाक्या फुटलेल्या, तुटलेल्या आहेत. या टाक्यांमध्ये पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे त्याचा वापर झालेला नाही. चार दिवसांनी एकदा येणाऱ्या टँकरवरच त्यांना अवलंबून राहावे लागते. मुंडा पाड्यानंतर जुईपाडा लागतो. या जुईपाड्यामध्ये एक आणि दोन मजली घरेही आहेत. त्यामुळे येथे सधनताही डोकावते. मात्र या जुईपाड्यातील लोकांनाही गोड्या पाण्यासाठी महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते.
गोराई गावातील नागरिकांनी प्रत्येकाला पाणी मिळावे, यासाठी टँकर किती दिवसांनी त्या गावात जाणार हे ठरवून घेतले आहे. त्यामुळे २०० लिटरचा एक ड्रम भरला की, मग चार दिवस त्याच पाण्यावर दिवस काढावे लागतात. या गावात अतिरिक्त पाइपलाइन घेतलेली आहे. मात्र या पाइपलाइनमधूनही पाणी येईल, याची खात्री नसते. एक ड्रम भरण्यासाठी दोन तास वेळ लागतो. पाण्याची दाबाची ही स्थिती असताना दुसरीकडे या सगळ्याच नागरिकांना पाण्याची बिले मात्र येतात. त्यामुळे पाणी येत नसताना पाण्याचे बिल कसे येते, याबद्दलही त्यांचा संताप आहे.

(पूर्वार्ध)