आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करा! मिशी काढेन म्हणणाऱ्या अजित पवारांना बंधूंकडून प्रत्युत्तर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत वर्चस्व कोणाचं? काकांचं की पुतण्याचं? या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात वाकयुद्ध रंगलं आहे. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांसाठी प्रचाराचा धडाका लावलेला असताना त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य त्यांच्या सोबत नसल्याचं चित्र आहे. अजित पवार त्यांच्या बंधूंवर जाहीर सभेतून टीका करत आहेत. तर त्यांचे बंधू माध्यमांना मुलाखती देत अजित पवारांना प्रत्युत्तर देत आहेत.

पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या आणि शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या घरातील व्यक्तींवर अजित पवार वारंवार निशाणा साधत आहेत. ‘आता ते नुसते प्रचाराला येत आहेत. ४ जून येऊ द्या. त्यानंतर यातील कोणीही जर तुम्हाला भेटायला आला तर मी मिशी काढून देईन. यांना मतदारांशी काहीही घेणंदेणं नाही. सगळे माझ्याच घरचे आहेत. पण आता फार चुरुचुरु बोलत आहेत. सगळे पोपटासारखे बोलू लागले आहेत. एकदा माझ्यासमोर या. मग बघू कोण कोणाला ऐकतंय,’ असं थेट आव्हान अजित पवारांनी त्यांच्या बंधूंना दिलं.
अजित पवारांचा लेक जरांगेंच्या भेटीला; मुंबईहून सराटी गाठली, सरप्राईज दौऱ्यामागचं कारण काय?
अजित पवारांनी दिलेल्या आव्हानाला त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते आता काय बोलले आहेत, ते त्यांनीच लक्षात ठेवावं. सगळ्यांसमोर बोलले आहेत तर त्यांनी ४ जूननंतर मिशा काढायला पाहिजेत, असं श्रीनिवास पवार म्हणाले. रणजीत दादा, राजू दादा इथे बारामतीमध्येच राहतात. त्यांची घरं इथेच आहेत. ते इथेच वास्तव्याला असतात. अजित पवारांनी टोकाची भूमिका घेतल्यानं आम्ही त्यांची साथ सोडली, असं श्रीनिवास पवारांनी सांगितलं.
भाजप, काँग्रेसमध्ये टफ फाईट, पण ‘त्या’ भीतीनं हवा टाईट; वर्षा गायकवाड, निकमांची अडचण काय?
मी तोंड उघडलं तर बाकीच्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी भावांना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन अजित पवारांचे चुलत बंधू आणि आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. जेव्हा उजनीच्या पाण्याबद्दल अजितदादांनी मुत्राची भाषा केली तेव्हा आमची मान शरमेनं खाली गेली होती. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आमची मान शरमेनं खाली गेली होती. नंतर त्यांनी दुपारचा शपथविधी केला. तेव्हाही आमच्यासोबत तोच प्रकार झाला. आता रात्रीचा एखादा आणखी नवा कार्यक्रम काही झाला तर अजून आम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला.

मिशा ठेवायच्या की काढायच्या, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की त्यांना पातळीपर्यंत जायची गरज का वाटली. ईडीनं आत टाकू दे अथवा बाहेर टाकू दे. चोरीच केली नसेल तर भीती कसली? असा सवाल त्यांनी विचारला. त्यांना आतमध्ये टाकायचंच असेल तर पर्याय नाही. मी आत जाईन, नाही तर माझा मुलगा जाईल. पण आम्ही काही पळून जाणार नाही. आम्ही तुमच्या बरोबर तिथे येणार नाही, असं प्रत्युत्तर राजेंद्र पवारांनी दिलं.