आघाडीमध्ये निवडणुका लढवायच्या पण वेळ पडली तर २८८ जागांची तयारी, ठाकरे गटाचं ‘पुढचं पाऊल’

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीमध्येच लढावयाच्या असल्या तरीही वेळ पडल्यास २८८ मतदारसंघात निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायला हवी. जागांच्या वाटाघाटीमध्ये ऐनवेळी नेमक्या किती जागा लढायच्या त्याचा निर्णय घेतला जाईल, मात्र तोवर सर्वच मतदारसंघात निवडणुका लढण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने रणनिती आखल्याचे समजते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका बैठकीत याबाबतची रणनिती ठरवितानाच कोणत्या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवायला हवी याबाबतचा आढावाही घेण्यात आल्याचे समजते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक बैठक पार पडली. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू, राजन विचारे यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरूवातीला ठाकरे गटाची ताकद असलेल्या विधानसभेच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली.
Hadapsar Vidhan Sabha : पुण्यातील प्राईम मतदारसंघासाठी मविआत रस्सीखेच, ठाकरे गटाकडून सांगली पॅटर्नची चर्चा

१२५ जागांचा आढावा, तिथे ताकद तिथे आपला उमेदवार असेल याची काळजी घेऊ

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात ज्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद आहे ते मतदारसंघ कटाक्षाने आपल्याकडेच राहतील याबाबतची रणनीती ठरली. अशा जवळपास १२५ जागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये जागांचे समसमान वाटप झाल्यास अशा कोणत्या ९० ते १०० जागांवर उमेदवार देता येईल त्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय ज्या नव्या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे ते कसे मिळवता येतील त्यावरही चर्चा झाल्याचे कळते. यात मुंबई, मराठवाडा, कोकण याबरोबरच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असल्याचे समजते.

कोणत्या जागांचा आग्रह धरायचा, याचीही रणनीती ठरली

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा, तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे, त्या जागांचा आग्रह धरायचा. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवायची असल्याने जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या, मात्र वेळ पडल्यास २८८ विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जागा लढविण्याचीही तयारी ठेवायची अशाप्रकारची रणनिती या बैठकीत ठरल्याचे समजते.