आई-वडिलांची सेवा हे कर्तव्य, राम मंदिरावर मत मागणं स्वार्थीपणा, अमोल कीर्तिकर भाजपवर बरसले

मुंबई : ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचा प्रयोग करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याने निकटवर्तीयांवर दबाव टाकण्यात येत आहे. अधिकाराचा गैरवापर करणे हीच हुकूमशाही असून ती मोडित काढण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गुरुवारी केले.

‘मी या दबावाला बळी पडत नसल्यामुळे मला तुरुगांत टाकण्याची भीतीही दाखवण्यात येते. पण मी घाबरणार नाही. वेळ पडल्यास तुरुगांतून निवडणूक लढवेन’, असा निर्धार कीर्तिकर यांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ या चर्चेवेळी व्यक्त केला.
मतदानाची टक्केवारी वाढली कशी? अनिल देशमुखांना वाढलेल्या आकडेवारीवर शंका
‘आमची शिवसेना ही नकली शिवसेना असल्याची टीका आमच्यावर केली जाते. पण प्रत्यक्षात वेगळे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजप हा खरा असून आता खोटा आहे’, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. ‘हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, हृदयात राम आणि हातात काम हे आमचे हिंदुत्त्व आहे. देवाची आणि आई-वडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असते. मग अशावेळी राम मंदिर बांधून कर्तव्य पूर्ण केल्यावर त्यावर मत मागणे हा स्वार्थीपणा आहे. निवडणूक रोख्यांबाबत भाजप काहीच बोलत नाही. ‘आपण घेतले ती मदत आणि दुसऱ्यांनी घेतले तर भ्रष्टाचार’ अशी नीती आहे’, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबईतील मराठी मतांबरोबरच मुस्लिम, दलित आणि इतर समाजातील मते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला.
बंडावेळी ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलेली! फडणवीसांनंतर शिंदेंचाही मोठा गौप्यस्फोट

‘वडिलांशी संबंध चांगलेच’

‘वडील गजानन कीर्तिकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी त्यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगलेच आहेत. पण राजकीय मार्ग आता वेगवेगळे असून त्यांनी वेगळा मार्ग धरला आणि मी वेगळ्या मार्गावर आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. ईडी प्रकरणात वडिलांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागतही केले. तर राजकारणात त्यांची परंपरा नक्कीच पुढे नेण्याचे काम मी करणार आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘राजकारणात काहीही होऊ शकते’

‘सध्याची स्थिती पाहता भविष्यात राजकारणात काही होऊ शकते. त्याबाबत आश्चर्य मानायला नको’, असे अधोरेखित करतानाच, सध्याचे राजकारण हे शॉर्टकटचे असून भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, असे ते म्हणाले. नजीकच्या भविष्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप एकत्र येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.