आइस्क्रीमचाचणी उन्हाळ्यातच; मालाडमधील घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाची कबुली

मुंबई : मालाड येथील एका डॉक्टरने ऑनलाइन मागवलेल्या आइस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) अन्न, तसेच औषधांच्या गुणवत्ता चाचणीसह आइस्क्रीमची चाचणी किती वेळा केली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर, आइस्क्रीम हा ऋतुमानानुसार (सिझनल) पदार्थ असल्यामुळे त्याची गुणवत्ता चाचणी उन्हाळ्यातच जास्त प्रमाणात केली जाते, असे स्पष्टीकरण ‘एफडीए’ने दिले आहे. तसेच, मालाडसारख्या गंभीर घटनेनंतर आइस्क्रीमची गुणवत्ता चाचणी वर्षभर घेण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टची स्वतंत्र व्याख्या केली आहे. दूध व दूधापासून मिळणाऱ्या पदार्थांच्या पाश्चराइज्ड मिश्रणांमध्ये गोड स्वादासाठी पौष्टिक घटक, फळे, अंडी आदींचे मिश्रण गोठवले जाते. त्यातून जो पदार्थ तयार होतो, त्याला आइस्क्रीम, कुल्फी किंवा सॉफ्टी आइस्क्रीम म्हणतात. मात्र यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असू नये.

फ्रोझन डेझर्टमध्ये दूधातले स्निग्ध पदार्थ, खाद्यतेले व स्निग्ध पदार्थ यांचा एकत्रित वितळण बिंदू हा ३७.० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक नसतो. दूध किंवा वनस्पतीमधील प्रथिने गोडवा आणणाऱ्या पौष्टिक घटकांसह गोठवली जातात. त्या पदार्थाला ‘फ्रोझन डेझर्ट’ असे म्हणतात. यात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे १० टक्क्यांपेक्षा कमी असू नये, असा निकष आहे. आइस्क्रीममध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि फॅटस् वापरली जात नाहीत, हा आइस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट यातील महत्त्वाचा फरक आहे.

या दोन्ही घटकांसाठी ‘एफडीए’कडून वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेचे निकष निर्धारित करून चाचण्या करण्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून या चाचण्या क्वचित केल्या जातात. दुसरीकडे ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढती आहे. दरम्यान, आइस्क्रीमध्ये मानवी बोट सापडण्याचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणानंतर आता आइस्क्रीमची वर्षभर गुणवत्ता चाचणी करण्यासंदर्भात विचार करण्याची गरज ‘एफडीए’चे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी व्यक्त केली.

अतिरिक्त मनुष्यबळाची गरज

‘महाराष्ट्र टाइम्स’ला मिळालेल्या माहितीनुसार, ‘एफडीए’कडे मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यामुळे अन्न व औषधांच्या ज्या चाचण्या करण्याची गरज असते, त्यादेखील वेळेवर पूर्ण करता येत नाहीत. नमुने घेणे, त्यांचे परीक्षण करणे जिकरीचे होते. आइस्क्रीमसंदर्भातील चाचण्यांसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. ती पूर्ण झाली तर प्रत्येक घटकाची चाचणी करणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Nashik AQI: हवेची गुणवत्ता सुधारली होऽऽ, ‘एन-कॅम्प’ अंतर्गत १२ टक्के सुधारल्याचा पालिकेचा दावा
आइस्क्रीमला वर्षभर पसंती
‘महाराष्ट्र टाइम्स’ने मुंबईकरांकडे आइस्क्रीमबाबत विचारणा केली असता, त्यांनी याचा आस्वाद आता वर्षभर घेतला जात असल्याचे सांगितले. ठरावीकच ऋतूमानामध्ये आइस्क्रीमला पसंती मिळते असे नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आइस्क्रीमच्या दुकानांची साखळी वेगाने वाढली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद असल्यामुळे ही संख्या वाढती असल्याचे मत विविध वयोगटातील मुंबईकरांनी व्यक्त केले.

‘एफडीए’च्या म्हणण्यानुसार…
– आइस्क्रीम हा ऋतुमानानुसार (सिझनल) पदार्थ
– त्यामुळे गुणवत्ता चाचणी जास्त करून उन्हाळ्यातच
– यापुढे वर्षभर चाचणी घेण्याच्या दृष्टीने विचार