…अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यातील दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसेच आश्वासक बदल न झाल्यास संघर्ष होईल, असा इशारा शरद पवार यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.

शरद पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पत्रातून शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
Nana Patole: दुष्काळग्रस्तांना सोडून सरकार सुट्टीवर; नाना पटोलेंची राज्य सरकारवर विखारी टीका

मंत्री गैरहजर आहेत, याची दखल घेतलीच असेल!

पुढे शरद पवार म्हणाले की, मागील महिन्यात २४ मे रोजी मी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू ह्या महत्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रातून पॉवर मिळणार, १० उमेदवारांचे काय होणार? मटाचा ग्राऊंड रिपोर्ट वाचा…

कुठे कुठे दुष्काळाची झळ? शरद पवार यांनी यादी वाचली

यावर सविस्तर लिहिताना शरद पवार म्हणाले की, मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. याकडे शरद पवार यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.
दुष्काळाचं भीषण संकट, हंडाभर पाण्यासाठी पायपीट, चारा नसल्याने जनावरे विकण्याची वेळ, फळबागा करपल्या, काँग्रेसची बैठक

पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना पवार म्हणाले, मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्य शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते, असे पवार म्हणाले.

‘दुष्काळाच्या प्रश्नावर आपण लक्ष घाला, अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल’

दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे. परंतू ह्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.