अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काही विलीन होतील; शरद पवारांचं भाकित

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष जवळ येतील. काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी वर्तवलं आहे. येत्या काळात राजकारणात मोठे बदल पाहायला मिळेतील असे संकेत पवारांनी दिले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी येत्या काळातील राजकारणावर सविस्तर भाष्य केलं.

‘पुढच्या दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील. आपल्या पक्षाचं हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील,’ असं भाकित शरद पवारांनी वर्तवलं. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर काँग्रेस आणि आमच्यामध्ये फारसा फरक नाही. आमची विचारधारा सारखीच आहे. आम्ही गांधी, नेहरु यांची विचारधारा मानतो,’ असं पवारांनी सांगितलं.
खडकवासल्यात डाव फिरला, इंदापूर वनसाईड; काका, पुतण्याची गणितं फेल; बारामतीत कोणाचा गेम?
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांच्या मागे असलेलं आमदारांचं बळ कमी झालं आहे. त्यामुळे त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा झाल्या. त्याबद्दल शरद पवारांना विचारणा करण्यात आली. ‘मी याबद्दल आताच काही बोलणार नाही. माझ्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय मी काही बोलणार नाही. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी मिळतीजुळती आहे. पुढचं पाऊल उचलण्याआधी सहकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. मोदी यांच्या नेतृत्त्वाशी जुळवून घेणं अवघड आहे,’ असं शरद पवार म्हणाले.

समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्रित काम करायला हवं असं उद्धव ठाकरेंनादेखील वाटत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. ‘ठाकरेंची विचार करण्याची पद्धत आमच्यासारखीच दिसत आहे,’ असं पवार म्हणाले. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा अंडरकरंट आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्येही हीच परिस्थिती आहे, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.