अजितदादांवर चिडून कॅबिनेट बैठकीतून काढता पाय? चंद्रकांत पाटील म्हणतात अर्थ विभागाने म्हणे…

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चिडून अर्ध्यातून निघून गेले, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र पुण्यात वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेलो होतो, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. अजितदादांवर रागवून निघण्याचा प्रश्नच नाही, मी पूर्वपरवानगीने बैठकीतून निघालो, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी येताच चंद्रकांत पाटील यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. “तुम्हाला काय हवंय मला माहिती आहे, त्यामुळे मीच त्या विषयावर बोलतो. काल पुण्यात ‘संतपूजन’ हा वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा कार्यक्रम होता. भाजपचे कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री हा कार्यक्रम आयोजित करतात. या ठिकाणी पाच हजार वारकरी येतात. त्यामुळे कॅबिनेट बैठक सुरु झाल्या झाल्याच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी पुण्याला गेलो. कारण सध्या पावसा पाण्याचे दिवस आहेत, ट्राफिक लागला तर साडेआठ वाजेपर्यंत मला पोहोचायचं होतं. तरी शेवटी नऊ वाजलेच. पण एवढे सगळे वारकरी प्रसादासाठी थांबले होते. त्यामुळे कॅबिनेट बैठकीतून मी निघून गेलो, नावाचा जो नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललाय तो चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Sanjay Raut : बिनचेहऱ्याची मविआ अजिबात नको, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हवाच, राऊतांचे ठाकरेंकडे अप्रत्यक्ष बोट
“हे कशावरुन सुरु आहे तर प्रोफेशनल कॉलेजमधल्या ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांची फी ५० टक्के माफ आहेच, पण आता ती १०० टक्के माफ करण्याचा निर्णय म्हणे अर्थ विभागाने फेटाळला. पण असं काहीही झालेलं नाही, असं काही होणारही नाही, केवळ आचारसंहिता आणखी दोन दिवस चालेल. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचं मतदान काल झालं, पण मतमोजणी बराच काळ चालते. त्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते. मग निवडणूक आयोग आचारसंहिता संपली असं जारी करतं, तोपर्यंत तुम्हाला मतदारांना आकृष्ट करणारे कोणतेही मोठे निर्णय घेता येत नाहीत. म्हणून हा निर्णय लांबला.” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

“या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, पण आचारसंहिता संपल्यावर निर्णय घेऊ, असं म्हणून तो विषय पेंडिंग राहिला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाबाबत इतके संवेदनशील आहेत. की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही. तांत्रिक कारणामुळे ते राहून गेलं. मी काही निघून गेलो नाही, परवानगीने कार्यक्रमाला गेलो.” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.