शिवसेना ठाकरे गटाचा २९ मे रोजी मोर्चा; दहिसरमधील अपुऱ्या नालेसफाईने नाराजी

मुंबई: मुंबईत नालेसफाईची कामे जलदगतीने होत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी दहिसरमध्ये ही सफाई अद्याप झालेली नाही. याशिवाय खराब रस्ते, प्रचंड वाहतूककोंडी आदी समस्यांनाही येथील नागरिकांना समोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विभाग क्रमांक-१कडून २९ मे रोजी सकाळी १० वाजता महापालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘पावसाळा तोंडावर आला असतानाही दहिसर विभागात खराब रस्ते, रस्त्यांची अर्धवट कामे, अपुरी नालेसफाई, दहिसर नदीची सफाई आदी कामे बाकी आहेत. याशिवाय प्रदूषण, गर्दीचे रस्ते, कमी पाणीपुरवठा यांसारख्या अनेक समस्यांनी दहिसरकरांना भंडावून सोडले आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयशी ठरली आहे’, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी रविवारी केली. या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व घोसाळकर करणार आहेत. हा मोर्चा दहिसर पूर्वेतील आनंदनगर मेट्रो स्टेशन (शिव मंदिरजवळून) ते दहिसर पश्चिममधील रूस्तमजी शाळेजवळील आर/उत्तर विभाग कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे.
CM Eknath Shinde: अनधिकृत होर्डिंग उभारल्यास थेट गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला आदेश
घोसाळकर यांनी दहिसरमधील सर्व रस्ते व नाल्यांची पाहणी केली. ‘दहिसर पूर्व, पश्चिमेचा विस्तार पाहिल्यास दहिसरवासीयांना वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. प्रदूषण वाढत असतानाच त्यांचा स्वच्छ, निरोगी हवेचा अधिकारही हिरावला जात आहे. महापालिका याकडे कधी लक्ष देणार’, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.