शिवडी, वरळी धोक्यात? मतदारसंघातील मताधिक्य घटले; आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेला चिंता

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील सहापैकी तीन जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले वर्चस्व अबाधित राखले असले, तरी या निवडणुकीत पक्षाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य मात्र चिंता करावी एवढे घटले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना जेमतेम साडेसहा हजार मतांची आघाडी मिळाल्याने वरळीमधून पुन्हा निवडून येण्यासाठी आदित्य ठाकरे यांना मेहनत करावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने ३० जागा, तर महायुतीने १७ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने राज्यातील १५० हून अधिक विधानसभा जागांवर मतांची आघाडी घेतली आहे, तर महायुतीने जवळपास १२५ विधानसभेच्या जागांवर आघाडी घेतली आहे. मुंबईतही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महाविकास आघाडीने चांगलीच आघाडी घेतली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ सोडले, तर उर्वरित पाचही लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीने चांगली मते घेतली आहेत. एकट्या ठाकरे यांच्या शिवसेनेने सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत आपला झेंडा रोवला आहे. मात्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात मात्र फारशी आशादायक परिस्थिती नाही.

वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. येथे ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव असा सामना होता. येथून अरविंद सावंत यांनी निवडणूक जिंकली. सावंत मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. यामिनी जाधव भायखळ्यातून आमदार आहेत. सावंत यांच्या तुलनेत यामिनी जाधव हा मतदारसंघात तितकासा ओळखीचा चेहरा नव्हता. साहजिकच अरविंद सावंत यांनी बाजी मारली. मात्र वरळीतून त्यांना फार मोठे मताधिक्य मिळालेले नाही.
मुस्लिमांचे मत उद्धव यांच्या शिवसेनेला; ‘या’ मुस्लिमबहुल मतदारसंघात ठाकरेच फेव्हरेट, कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
अरविंद सावंत यांना वरळीमधून केवळ सहा हजार ७१५ मतांची आघाडी मिळाली आहे. वरळी मतदारसंघात पक्षाची ताकद वाढावी, यासाठी येथून सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. मात्र त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीमधून जोर लावावा लागणार आहे.

शिवडीतही अडचणी

ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदारसंघात अरविंद सावंत यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे ठाकरेंची ही जागाही धोक्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ निवडण्यासाठी चाचपणी सुरू असताना, त्यात शिवडीचाही विचार करण्यात आला होता. मात्र आता हा मतदारसंघ सुरक्षित राहिला आहे की नाही, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती आल्याचे बोलले जाते.