शरद मोहोळ हत्याप्रकरणात १७५० पानांचे आरोपपत्र; शेलार, मारणे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा

प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अठरा आरोपींविरोधात पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात १७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार या अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, या टोळीचा प्रमुख विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे या खुनामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. आता या सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार असून, त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार, हल्लेखोर साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे आणि विठ्ठल किसन गांदले, यांच्यासह अॅड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, नामदेव महिपती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे अशा सतरा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली, तर एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी कालावधी संपल्यानंतर गुन्हे शाखेने नव्वद दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने तीस दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने ‘मकोका’ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन पुन्हा मुदतवाढ घेऊन अखेर १३९ दिवसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने तपास केला.