वेगळा निर्णय घेण्याचं ओबीसी कार्यकर्त्यांचे आवाहन, भुजबळांकडे लक्ष; कोणता निर्णय घेणार?

प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांच्या भावनांना सोमवारी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर वाचा फोडली. सातत्याने डावलले जाण्यापेक्षा वेगळा निर्णय घ्या, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भुजबळ यांनी वांद्रे येथे समता परिषदेची बैठक सोमवारी दुपारी बोलावली होती. भुजबळ जो निर्णय घेतील त्याला समाजातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा असेल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पक्षात सातत्याने डावलले जाणे, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय होणे, यामुळे झाले तेवढे पुरे, आता वेगळा निर्णय घ्या, असे आवाहन समता परिषदेच्या बैठकीनिमित्त जमलेल्या ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केले.
EVM Hacking Row: वायकरांच्या मेहुण्याने वापरलेला मोबाइल गायब झाल्याचा अनिल परब यांचा दावा; ठाकरे गट उत्तर पश्चिमच्या निकालाप्रश्नी न्यायालयात जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना साथ दिली. परंतु, संस्थापक सदस्य असलेल्या भुजबळ यांना पक्षात न्याय दिला जात नसल्याची चर्चा आहे. त्यातही, लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली नाही. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांना नव्याने सहा वर्षांची राज्यसभा देणे आणि त्यानंतर त्यांची उर्वरित साडेचार वर्षांची राज्यसभेची जागा जाहीर मागणी करूनही सुनेत्रा पवार यांना देणे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात न बोलावणे यामुळे भुजबळ नाराज आहेत.

भुजबळांनी अनेकदा पक्षाच्या बैठकीत नेत्यांना खडे बोल सुनावले असून, राज्यसभेसाठी आपण इच्छुक होतो, असे जाहीर करीत त्यांनी पक्षनेतृत्वाची कोंडी केली होती. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळत असून, त्यामुळे सातत्याने आवाज उठवूनही महायुती सरकार भुजबळ यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी वांद्रे येथील एमईटी या संस्थेत समता परिषदेची बैठक बोलावण्यात आली. ही बैठक सुमारे चार तास चालली. या बैठकीत ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी भुजबळांना, झाले तेवढे पुरे, आता वेगळा निर्णय घ्या, असे आवाहन केल्याचे समजते. भुजबळ यांनीही आपली भूमिका लवकरच स्पष्ट करण्याचे संकेत दिल्याचे कळते.
Proud Moment! शेतीवर कुटुंबाचा डोलारा, घराला छप्परही नाही; तरी ५वी पास बापाची तीनही मुलं बनणार डॉक्टर

-राष्ट्रवादीत डावलले जात असल्याने घुसमट

-समता परिषदेच्या बैठकीत अस्वस्थतेला वाचा

-लवकरच मोठ्या राजकीय निर्णयाचे संकेत

कोणता निर्णय घेणार?

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंड करून काँग्रेसचा रस्ता धरला होता. त्यानंतर शरद पवारांची साथ देत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार यांना साथ देत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आता भुजबळ कोणता निर्णय घेणार, याबद्दल औत्सुक्य आहे. ते पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पक्षफुटीनंतर पवार यांनी येवल्यात घेतलेली सभा भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेली आहे. भुजबळांपुढे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पक्षांत त्यांनी यापूर्वीही काम केले आहे. पण, आपल्या ओबीसी कल्याणाच्या भूमिकेला कुठे अधिक न्याय मिळेल, याचा अंदाज घेऊनच ते पुढचे पाऊल टाकतील, असे बोलले जाते.

‘ते मनाने भाजपसोबत गेले नव्हते’

छगन भुजबळ हे मनाने भाजपसोबत गेले नव्हते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तर, भुजबळ नाराज आहे की नाही, हे तेच सांगू शकतील, असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले. मात्र, आपल्या समाजाचे हित आपल्याकडून जोपासले जावे, अशी नेत्यांची इच्छा असते, तेच भुजबळांकडून होईल, असे वाटत असल्याचे केसरकर म्हणाले.