विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका, ‘थ्री कोर्स मील’ची मेजवानी, शालेय पोषण आहारात १५ लज्जतदार पदार्थ

प्रतिनिधी, पुणे : राज्यातील शाळांमध्ये ‘पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण’ योजनेच्या अंतर्गत (पूर्वीचे शालेय पोषण आहार) येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना अंडा पुलाव, मसालेभात, मटार पुलाव, व्हेजिटबल पुलाव, तांदळाची खीर अशा पद्धतीचे ‘थ्री कोर्स मील’ देण्याचा निर्णय मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने घेतला. शिक्षण विभागाने नेमलेल्या पाककृती सुधारणा समितीने सुचवलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या माध्यमातून सरकारी आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे.केंद्र सरकारने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा आणि तृणधान्यांचा समावेश करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारात स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा; तसेच पौष्टिकपणा वाढवणे, आहारात वैविध्य आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती.

काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पुणे तुंबले; पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुंटल्याने पुराचा धोका, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

या समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतींसह योजनेत सुधारणा करण्याचे अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांत परसबागा निर्माण करण्यात येत आहे. या परसबागेतील उत्पादित भाजीपाला आणि फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने, विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होणार आहे.

१५ प्रकारच्या पाककृती देणार

या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्य आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (थ्री कोर्स मिल) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील. या आहार पद्धतीत तांदूळ, डाळी आणि कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य, गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि नाचणी सत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती निश्चित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

दर दिवशी वेगळे पदार्थ देणार

या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, मसालेभात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व, मोड आलेली कडधान्ये आदींचा समावेश करण्यात आला आहे. या पाककृतींनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे एक ते १२ पाककृती वेगवेगळ्या दिवसांसाठी निश्चित करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांत प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल, असे निर्णयात सांगण्यात आले आहे.

अशी करणार आहाराची विभागणी

गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत होती. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना या दिवशी व्हेजिटेबल पुलाव द्यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी किंवा स्थानिक फळ देण्यात यावे. या दिवशी तांदळाची खीर, नाचणी सत्व आणि मोड असलेले कडधान्य देऊ नये, असेही निर्णयात सांगण्यात आले आहे.

…तर निधी सरकार देईल

गोड खिचडी, नाचणी सत्व आणि तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर, गूळ /साखर आणि सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. या वस्तू पुरवठादार पुरवीत नसल्याने या वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालकांनी शाळास्तरावर वितरीत करावी. या निधीतून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर, गूळ / साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना या पदार्थाचा लाभ द्यावा. त्यानंतर खर्चाचा आढावा शिक्षण संचालकांनी घ्यायचा आहे. या निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी सरकारमार्फत देण्यात येईल.