राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारांचा राहणार नसून भाजपचा होणार कारण… रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई: नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा रविवारी (९ जून) शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली तेव्हा राष्ट्रवादीचे कोणीही उपस्थित नव्हते. नव्या केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याचा कोणताही फोन न आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
Assembly Elections: मी कधी हिशेब करण्यात चुकत नाही, हे अख्या जिल्ह्याला ठाऊक आहे; सुनील केदारांचे मेघेंना आव्हान
दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळही येथे उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे सदस्य आहेत. यावर आता शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्यांनी अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे.रोहित पवार म्हणाले की, अजितदादांची सत्ता कमी झाली आहे. तुमच्यामुळे आम्हाला फायदा झाला नाही, असा संदेश भाजपला द्यायचा आहे. अजितदादांना पुढे जाऊन भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार असल्याचा धक्कादायक दावा रोहित पवारांनी यावेळी केला आहे. जे नेते शरद पवार साहेबांना सोडून गेले. त्यांना व्यक्तीगत काही मिळालं आहे. दादांचा सर्वाधिक फायदा प्रफुल्ल पटेल यांना झाला आहे. ईडीचा तपासही बंद झाला आणि राज्यसभेलाही मिळाला.

जे साहेबांना सोडून गेलेत त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय आहे. तो म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवावी लागणार. तसेच फुटलेला राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारांचा राहणार नाही. आता तो भाजपचा होणार आहे, कारण एकही मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी केंद्राकडून आपल्या लोकांसाठी काही गोष्टी मागितल्या. मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी काहीच मागितले नसल्याचे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे.