राईट हँडसाठी ठाकरेंची मिटिंग अन् गेम फिरला, नार्वेकर विजयी; ‘त्या’ बैठकीची इनसाईड स्टोरी

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं ११ पैकी ९ जागा जिंकल्या. महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीत चिंतेचं वातावरण होतं. तर मविआची गाडी सुसाट होती. पण विधान परिषदेच्या निकालामुळे महायुतीची गाडी रुळावर आली आहे. तर मविआच्या गाडीला ब्रेक लागला आहे.

ठाकरेसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानं परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार ही बाब स्पष्ट झाली. नार्वेकरांचे असलेले सर्वपक्षीय संबंध, बड्या नेत्यांशी त्यांचा असलेला संवाद यामुळे उद्धव ठाकरेंनी नार्वेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. ठाकरेसेनेकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ नसतानाही ठाकरेंनी उमेदवार दिला होता. पण नार्वेकरांनी विजय खेचून आणला. तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढत असलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले.
Milind Narvekar : ठाकरेंची १५ मते, काँग्रेसची साथ, सर्वपक्षीयांचे मदतीचे हात, नार्वेकरांच्या खांद्यावर विजयी गुलाल!
गुरुवारी म्हणजेच ११ जुलैला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते आणि आमदारांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांनी काँग्रेस आमदारांना संबोधित केलं. नार्वेकरांना मतदान करण्याची विनंती ठाकरेंनी केली. त्यावेळी ठाकरेंसोबत नार्वेकर उपस्थित होते. नार्वेकरांनी परिषदेवर निवडून आणण्यासाठी मदत करा. त्या बदल्यात विधानसभेला काही जागांवर तडजोड करतो, असा प्रस्ताव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला दिल्याचं समजतं.
शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला? कुणी केला? १२ मतांच्या ४ शक्यता
उद्धव ठाकरे गटाकडे स्वत:चे १४ आमदार आहेत. याशिवाय एका अपक्ष आमदाराचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे संख्याबळ १५ वर पोहोचलं. उरलेल्या ८ मतांसाठी ठाकरेंनी काँग्रेसची मदत मागितली. नार्वेकरांसाठी ते काँग्रेसच्या आमदारांना भेटले. त्यांना मदतीसाठी विनंती केली. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी पक्षानं २५ मतांचा कोटा ठरवला. काँग्रेसकडे ३७ आमदार असल्यानं त्यांच्याकडे १२ मतं अधिकची होती.

नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. काँग्रेसनं पहिल्या पसंतीचे एकही मतं जयंत पाटील यांना मिळालं नाही. नार्वेकरांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मतं मिळाली असं गृहित धरलं तरीही त्यांची ५ मतं फुटली. नार्वेकरांनी अपक्ष आणि लहान पक्षांची २ मतं खेचली असं गृहित धरलं तर काँग्रेसची ७ मतं फुटल्याचा तर्क मांडला जात आहे.