मुंबईत पुन्हा उष्णतेत वाढ, विदर्भात मुसळधार, १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: मान्सूनच्या आगमनासोबतच राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाऊस झाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला आता वेग आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात जोरदार पाऊस

दरम्यान, संपूर्ण विदर्भात पावसाने हजेरी लावली असून पुढील पाच दिवस विदर्भात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचे वर्तवला आहे. आज राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडेल आणि येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

१६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

अहमदनगर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुणे यासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून या १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड आणि नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत बुधवारी (१२ जून) चेंबूर, देवनार भागात तुरळक पाऊस झाला. मुंबईच्या उर्वरित भागात फारसा पाऊस न झाल्याने शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि पावसाअभावी मुंबईकरांना पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. कुलाब्यातील कमाल तापमान २४ तासांत २.३ अंश सेल्सिअसने वाढले, तर सांताक्रूझ येथे मंगळवारच्या तुलनेत तामपानात बुधवारी १.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. दोन्ही केंद्रांवर दिवसभरातील आर्द्रता ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचली.