मिहीर शहाच्या वडिलांची शिंदेसेनेतून हकालपट्टी; तीन दिवसांनंतर राजेश शहांवर शिंदेंची कारवाई

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहांची शिंदेसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास राजेश शहांच्या मुलानं बीएमडब्ल्यू कारनं वरळीत दाम्पत्याला उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती थोडक्यात बचावला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा रविवारपासूनच फरार होता. त्याला काल विरारमधून अटक करण्यात आली. यानंतर आज राजेश शहांची शिंदेसेनेतून हकालपट्टी झालेली आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयानं राजेश शहांच्या हकालपट्टीचा आदेश काढला आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या आदेशावरुन राजेश शहांना शिवसेना उपनेतेपदावरुन कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हिट अँड रनच्या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राजेश शहांना या प्रकरणात अटक झालेली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयानं जामीन दिला.
Worli Hit and Run : नरकातल्या राक्षसाहून बेकार हिट अँड रन, मिहिर शाहला कोळीवाड्यात सोडून द्या : आदित्य ठाकरे
रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीर शहाच्या बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर नाखवा दाम्पत्य प्रवास करत होतं. ते ससून डॉकवरुन घरी परतत होते. कारची धडक बसताच नाखवा दाम्पत्य बोनेटवर पडलं. प्रदिप नाखवांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यांनी कारसोबत धाव घेत चालकाकडे गयावया केली. कार थांबवण्यासाठी आर्जवं केली. पण मिहीर शहानं कार दामटवली. त्यामुळे प्रदिप यांच्या पत्नी कावेरी गंभीर जखमी झाल्या.
Today Top 10 Headlines in Marathi: भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, तर पोलिसांना मिहीर शहा कसा सापडला? सकाळच्या दहा हेडलाईन्स
कावेरी यांना मिहीरनं २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर मिहीरनं कार थांबवली. त्यानं कारमधून बाहेर पडत त्याचा चालक राजऋषीच्या मदतीनं बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरींना बाहेर पडलं. त्यानंतर राजऋषी कारच्या ड्रायव्हर सीटवर बसला. त्यानं कार कावेरी यांच्या अंगावरुन नेली. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अपघातानंतर मिहीरनं वडील राजेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिला. मिहीरनं कार वांद्र्यातील कलानगरला सोडली. मग तो गोरेगावात त्याच्या प्रेयसीकडे गेला. तिथे तो सकाळी आठपर्यंत थांबला. त्याची आई आणि दोन बहिणी तिथे पोहोचल्या. त्यांच्यासोबत मिहीरनं शहापूर गाठलं. तो तिथे एका रिसॉर्टमध्ये राहत होता. मित्राच्या मोबाईलच्या माध्यमातून तो फोनाफोनी करत होता. काल त्यानं लोकेशन बदललं. तो मित्रासोबत विरारला गेला. तेव्हा त्याच्या मित्रानं फोन १५ दिवसांसाठी ऑन केला. त्यामुळे त्याचं लोकेशन पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.