महाराष्ट्राची दीर्घ परंपरा म्हणत वारीनिमित्त राज ठाकरेंच्या शुभेच्छा; जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, विठुचरणी साकडं

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यभर भक्तीमय वातावरण आहे. यानिमित्त अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन आषाढी एकादशीच्या भक्तीसोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यातच लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांची पोस्ट. राज ठाकरे यांची बोलण्याची शैली हटके आहे हे सारा महाराष्ट्र जाणतो. आजही राज ठाकरेंनी विठुरायासाठीच्या महाराष्ट्रातील अपार श्रद्धेचे वर्णन करत जातीपातींमध्ये भेद या विषयावर चिंता व्यक्त केली आहे.

राज ठाकरे आपल्या एक्सवरील पोस्ट मध्ये लिहितात, ‘आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात.’
Pandharpur Mahapooja: यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला विठूरायाच्या पूजेचा मान, अहिरे दाम्पत्य म्हणतात…
दिंडीसोबत चालताना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे, असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं, अशा शब्दांत अपार श्रद्धेचं वर्णन केलं आहे.

पांडुरंगाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणतात, भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो.

पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चाललं आहे की हाच का तो महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही, असे म्हणत राजकारणाची परिेस्थिती आणि जातीपातीच्या भेदावर चिंता व्यक्त केली आहे.

तर आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी विठ्ठलाच्या चरणी साकडं घातलं आहे.