”भूखंडावरील श्रीखंड खाण्यावर भाजपचा डोळा”, डेअरची जागा धारावी प्रकल्पाला देण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध

मुंबई: कुर्ला येथील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम, कायदे, अटी ह्या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत. कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. तर ही जागा सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
पक्षातील अनेक जण इच्छुक होते, अजितदादांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभा, शरद पवार यांना शह
कुर्ला येथील मदर डेअरीची २१ जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदानीची असा प्रकार सुरु आहे. भाजपा सरकारने अदानीसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला.नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी आणि पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी केला.

कुर्लाच्या भूखंडावर ८०० ते ९०० मौल्यवान झाडे आहेत, ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. पण या झाडांची निर्दयीपणे कत्तल करून या इको-सेन्सिटिव्ह भूखंडच्या मुद्रीकरणाचे मनसुबे महाभ्रष्टयुती सरकारचे आहेत. भाजपला पर्यावरणाशी, लोकांच्या हक्कांशी काही देणेघेणे नाही, या सगळ्यांचा डोळा भूखंडावरील श्रीखंड खाण्यावर आहे. पण आम्ही तसे हाऊ देणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व इथल्या रहिवाशांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी इथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी एक लोकचळवळ निर्माण केली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी जाहीर केले.