पुण्यात पाणीकपातीचे संकट! खडकवासला धरणसाखळीत केवळ इतकाच पाणीसाठा शिल्लक

प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ ६.७२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी आणि शेतीसाठीचे आवर्तन व बाष्पीभवन असे गणित साध्य करायचे असल्याने पुण्यातील पाणीकपात अटळ बनली आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली की लगेचच पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, तूर्तास पाणीकपात होणार नाही, असा दावा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, भामा आसखेड, पवना या सहा धरणांमधून पाणीपुरवठा होतो. यामध्ये खडकवासला धरण साखळीवर शहराचा बहुतांश भाग अवलंबून आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे शंभर टक्के भरू शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर धरणसाठ्याचा १५ जुलैपर्यंत काटेकोर वापर करण्याच्या निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. मात्र, आता वाढत्या उकाड्यामुळे वाढलेली पाण्याची मागणी आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्याने खालावत असून, त्यामुळे पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पुण्यात पाणीकपात लागू करावी लागणार आहे.

साडेसहा टीएमसी पाणीसाठा

मंगळवारी खडकवासला धरणसाखळीत ६.७२ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ९.१७ टीएमसी पाणीसाठा होता. पुणे शहराला दरमहा पिण्याच्या पाण्यासाठी १.५८ टीएमसी पाणी लागते. याशिवाय खडकवासला धरणातून दौंडसह अन्य भागांना शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाते. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पुण्याला १५ जुलैपर्यंत तीन टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे ३.७२ टीएमसी पाणीसाठ्यात शेतीसाठीचे आवर्तन द्यावे लागेल. याशिवाय उकाड्याची तीव्रता कायम राहिल्यास एक ते दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत वापरायचा असल्यास पुण्यात पाणीकपात करावी लागेल. याशिवाय शेतीसाठी जाणाऱ्या आवर्तनातही कपात करावी लागेल, असा सूत्रांचा दावा आहे.

निवडणुकांमुळे लांबणीवर

वास्तविक जानेवारी महिन्यापासूनच पुण्यात काही प्रमाणात पाणीकपात लागू होणे आवश्यक होते; परंतु आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता ही पाणीकपात टाळली गेली. दरम्यानच्या काळात शेतीसाठी आवर्तनही सोडले गेले. बाष्पीभवनाने पाणीसाठा खालावल्याने या पार्श्वभूमीवर पाणीकपातीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा…! महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पाणीकपातीचे नियोजन

तूर्तास पाणीकपातीचा निर्णय झालेला नाही. मात्र, आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास, कुठे कोणत्या दिवशी पाणीकपात करायची याचे नियोजन पालिकेकडे तयार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवल्यास पाणीबचतही कमी होते आणि त्याचा फटका पुढील दोन तीन दिवसही बसतो. त्याऐवजी दर दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्याचा अपेक्षित परिणाम होतो. मात्र, हेच गणित पेठांच्या परिसरातील पाणीपुरवठ्याला लागू होत नाही. तिथे पाणीपुरवठ्याचे पुरेसे जाळे नसल्याने तिथे दररोज पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याचा आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत. सध्या पाणीटंचाई असलेल्या भागात १४०० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तूर्तास पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.-डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त

आचारसंहिता संपल्यानंतर कपात

पाणीपुरवठ्याबाबतचे निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा समितीच्या बैठकीत घेतले जातात. पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय याच बैठकीत घेतला जाणार आहे. तूर्तास आचारसंहिता लागू असल्याने ही बैठक आचारसंहिता संपल्यानंतरच होतील. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री अजित पवार तातडीने कालवा समितीची बैठक घेऊन पाणीकपात लागू करणार का, याकडे लक्ष लागले आहे.