परिषदेच्या निवडणुकीत कोण डेंजर झोनमध्ये? कोण सेफ? काय सांगतो नंबर गेम? वाचा संपूर्ण समीकरण

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान होईल. कोणते ११ खेळाडू परिषदेत जाणार आणि विकेट नेमकी कोणाची पडणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल. आपापली मतं फुटू नयेत यासाठी सगळ्याच पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आमदारांना हॉटेलांमध्ये ठेवण्यात आलं आहे. क्रॉस व्होटिंगचा धोका असल्यानं धक्कादायक निकालाची नोंद होऊ शकते.

कोणत्या पक्षाकडून कोण कोण रिंगणात?
भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. शिंदेसेनेनं माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमानेंना संधी दिली आहे. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजी गर्जे रिंगणात आहेत. काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेसेनेकडून मिलिंद नार्वेकर, तर शरद पवार गटानं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. परिषदेच्या निवडणुकीत विजयासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवावी लागतील.
MLC Elections : दादा गटातील नेत्याच्या आमदार मुलाची बैठकीला दांडी, काँग्रेसने मतांचा कोटा सर्रकन वाढवला
मतांची समीकरणं कशी?
भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी भाजपला ११५ मतं लागतील. भाजपकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांना पहिल्या पसंतीची ३ मतं कमी पडत आहेत. शिंदेसेनेचे दोन उमेदवार आखाड्यात आहेत. त्यांच्याकडे ३९ स्वपक्षीय आमदार आणि १० अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे शिंदेसेनेच्या उमेदवारांना धोका नाही. अजित पवार गटाकडे ३९ आमदार आहेत. त्यांना विजयासाठी आणखी ७ मतांची गरज भासेल. काही अपक्ष, छोटे पक्ष आणि काँग्रेसमधील ३ मतांच्या जोरावर दादांच्या उमेदवारांची नय्या पार लागेल, असं म्हटलं जातं.
Vidhan Parishad Election : आमदारांवर डाऊट, कोण होणार आऊट! विधान परिषद निवडणुकीत कुणाची होणार फाटाफूट?
महाविकास आघाडीचं गणित काय?
ठाकरेसेनेकडे १५ आमदार आहेत. त्यांच्यासोबत १ अपक्ष आमदार आहे. त्यामुळे त्यांना आणखी ७ मतं लागतील. शेकापचे जयंत पाटील शरद पवारांच्या पाठिंब्यावर लढत आहेत. पवारांकडे १५ आमदार आहेत. जयंत पाटील यांच्या पक्षाच्या एका आमदाराचा त्यांना पाठिंबा मिळेल. मग त्यांच्याकडे १६ मतं होतात. त्यांनादेखील आणखी ७ मतांची गरज लागेल.

काँग्रेसची मतं निर्णायक ठरणार

काँग्रेसची मतं सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहेत. काँग्रेसकडे ३७ मतं आहेत. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना विजयासाठी पहिल्या पसंतीची २३ मतं लागतील. त्यानंतर पक्षाकडे १४ मतं शिल्लक राहतात. ती नेमकी कोणाला मिळतात यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. काँग्रेसचे ४ जण क्रॉस व्होटिंग करतील, असा दावा शेकापचे नेते आणि उमेदवार जयंत पाटील यांनी केला आहे. हे आमदार फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेससोबत आहेत. ते मनानं काँग्रेसमध्ये नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.