त्यानं एक सेकंद जरी कार थांबवली असती तर…; पत्नी गमावलेले नाखवा धाय मोकलून रडताना काय म्हणाले?

मुंबई: मासेविक्री करणारे पती-पत्नी प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे रविवारी पहाटे मासे खरेदी करण्यासाठी ससूनला गेले होते. त्यांनी मासे खरेदी केले आणि ते घराकडे निघाले. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की हे त्यांच्या पत्नीसोबतचे त्यांचे अखेरच क्षण असतील. हे दोघे कोळीवाडा येथील घराकडे जात असताना एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये प्रदीप हे रस्त्यावर फेकले गेले तर कावेरील गाडीने फरफटत नेले.

गाडी बायकोला फरफटत नेत असल्याचं पाहून प्रदीप यांनी गाडीचा अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. पण, त्यांना कावेरी दिसल्या नाहीत. त्यानंतर ते पोलिसांत गेले. तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं की कावेरी यांचा मृतदेह त्यांना वांद्रे-वरळी सी-लिंकवर सापडला आहे.
Mumbai Hit And Run: मैत्रिणीकडून त्याला शहापूरला नेलं, दोन दिवस लपवलं, मिहीरची आई, दोन बहिणी पोलिसांच्या ताब्यात

मी रडलो, ओरडलो पण तो थांबला नाही – प्रदीप नाखवा

मी गाडीमागे अर्ध्या किलोमीटरपर्यंत धावलो, पण मला कावेरी दिसली नाही. मी रडलो, ओरडलो पण तो थांबला नाही. जर तो एका सेकंदासाठीही थांबला असता तर असं काही झालंच नसतं, असं प्रदीप नाखवा यांनी एनडीटीव्हीला सांगितलं. त्यांच्याबाजुला त्यांची मुलगी आपल्या आईचा फोटो हाती घेऊन बसलेली होती. ‘माझी मुलगी तिच्या आईसाठी रडते आहे, आता मी तिला आई कुठून आणून देऊ’, असं म्हणताच प्रदीप यांना अश्रू अनावर झाले.

बड्या नेत्याचा मुलगा असल्याने वाचवण्याचा प्रयत्न, प्रदीप नाखवांचा आरोप

प्रशासन शिवसेना नेत्याचा मुलगा आरोपी मिहीर शहाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तो एका बड्या प्रभावशाली नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याला वाचवलं जात आहे. मी एक गरीब व्यक्ती आहे, माझा कोणीही विचार करणार नाही, असंही ते म्हणाले.

इतकंच नाही तर प्रदीप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे. गृहमंत्री काय करत आहेत? आरोपीचे वडील हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने तुम्ही गप्प आहात का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत कारवाईचे आश्वासन दिले आहे. कायदा स्वतःचा मार्ग घेईल, कायद्यापुढे सर्व समान आहेत, असंही ते म्हणाले.

६० तासांनी मिहीर शहाला अटक

आरोपी मिहीर शहा हा अपघातानंतर फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वडील राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक केली होती. मात्र, कोर्टाने राजेश शहाला जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल ६० तासांनी आरोपी मिहीर शहाला शहापूर येथून अटक केली. त्याशिवाय त्याची आई, दोन बहिणी आणि मित्रासह तब्बल १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शहाविरुद्ध भारतीय न्याय संहिता या नवीन फौजदारी संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या, रॅश ड्रायव्हिंग आणि पुरावे नष्ट करणे या कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.