तिसऱ्या टप्प्यात २६ हजार मतदारांचे ‘गृहमतदान’, सर्वाधिक ४ हजार ५८८ अर्ज धाराशीव मतदारसंघात

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदापासून प्रथमच ८५ वर्षांवरील, आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाचा (घरातून पोस्टल मतदान करण्याची मुभा) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत राज्यात आगामी तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघासाठी २६ हजार २११ मतदारांनी नोंदणी केली आहे. यात प्रामुख्याने धाराशीव (उस्मानाबाद) मतदारसंघामध्ये सर्वाधिक चार हजार ५८८, तर सर्वांत कमी बारामती मतदारसंघासाठी फक्त ४३१ गृहमतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली.

राज्यात तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील दोन, पश्चिम महाराष्ट्र सात, कोकणातील दोन अशा एकूण ११ मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये २५८ उमेदवार रिंगणात असून, यात सर्वाधिक ३८ उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत. त्यानंतर माढा मतदारसंघात ३२, तर धाराशीव मतदारसंघात ३१ उमेदवार अंतिम यादीत असल्याचे सांगण्यात येते.

तिसऱ्या टप्प्यात मतदानासाठी एकूण दोन कोटी नऊ लाख ९२ हजार ६१६ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात एक कोटी सात लाख ६४ हजार ७४१ पुरुष, आणि एक कोटी दोन लाख २६ हजार ९४६ महिला आणि ९२९ तृतीयापंथी मतदार आहेत. यात गृहमतदानासाठी २६ हजार २११ जणांनी १२ डी हा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती आयोगातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १४ हजार ६१२ जणांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघातून सर्वाधिक दोन हजार ९९२ आणि अकोला मतदारसंघातून दोन हजार ६६७ मतदारांचा समावेश होता.

टक्का वाढविण्याचा प्रयत्न

गेल्या काही निवडणुकांची टक्केवारी लक्षात घेता बहुतांश वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानासाठी केंद्रावर जात नसल्याची बाब आयोगाच्या निदर्शानस आली आहे. त्यामुळेच यंदापासून हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटत आहे.

सत्यजीत यांच्या नावातच ‘सत्य’ आणि ‘जीत’, पवारांनी सांगितलं हातकणंगले जिंकण्याचं समीकरण

गृहमतदानासाठी मतदारसंघनिहाय अर्ज
रायगड ३,१४६
बारामती ४३१
धाराशीव (उस्मानाबाद) ४,५८८
लातूर २,५६६
सोलापूर २,०५२
माढा २,३४६
सांगली १,८५९
सातारा १,२७२
रत्नागिरी-सिंधुदुर्ग ३,७२६
कोल्हापूर ३,१०३
हातकणंगले १,१२२
एकूण २६,२११