ऐन उन्हाळ्यात कोथिंबीरने केले दोन भावांना लखपती, पंचक्रोशीत रंगली शेतकऱ्यांच्या यशाची चर्चा


प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे :
रोजच्या स्वयंपाकात कोथंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत थोडी तरी कोथिंबीर टाकलीच जाते. मात्र कोथिंबीरीने सध्या चांगला भावा खाल्ला आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला झाला आहे. या कोथिंबीरीने शेतकऱ्याला लखपती केले आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावातील दोन शेतकऱ्यांना कोथिंबीरीने लखपती केले आहे. त्यांची चर्चा आता पंचक्रोशीत होऊ लागली आहे.

पुरंदर तालुक्यातील वीर येथील शेतकरी राजेंद्र धुमाळ आणि प्रतापराव धुमाळ यांना कोथिंबरीने लखपती बनवले आहे. राजेंद्र धुमाळ यांनी दोन एकर शेतात कोथिंबीर लावली होती. त्यांना यातून साडे तीन लाख रुपये मिळाले आहेत. तर दुसरे शेतकरी प्रतापराव धुमाळ यांना दहा पांड कोथंबरीचे एक लाख रुपये मिळाले आहेत .विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर ही खरेदी केली आहे. त्याच बरोबर स्वतः मजूर लावून ती उपटून मार्केट मध्ये नेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या काढणी व वाहतूक खर्चातही बचत झाली आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई आहे. उन्हाळा असल्याने प्रचंड उष्णतेमुळे अनेकांनी लावलेली कोथंबीर जागेवरच जळून गेली आहे. त्यामुळे बाजारात कोथंबिरीचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे मागणी वाढून कोथंबीरीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोथंबिरीच्या एका पेंडीला ५० ते ७० रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कोथंबरीचे उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.

याबाबत ‘मटा’शी बोलताना शेतकरी प्रतापराव धुमाळ म्हणाले कि, मागील पाच वर्षापासून मी कोथंबीरीच उत्पादन घेतो. यावर्षी पाणी कमी असल्याने केवळ १२ पांड क्षेत्रात कोथंबीर लावली. पण उष्णतेमुळे यातील दोन पांड जळून गेली. मात्र यातील राहिलेल्या कोथंबरीला तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी दिले. दिवसातून तीन ते चार वेळा पाणी दिले. ४० दिवसात ती काढणीस आली आहे.पुण्यातील व्यापाऱ्याने जागेवरच खरेदी केली, यासाठी त्यांनी एक लाख रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.