आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार, मराठा-धनगरांना आरक्षण देणार : राहुल गांधी

पुणे : नरेंद्र मोदीजी, आपण देशाचे पंतप्रधान आहात. १० वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर देशासमोरील प्रश्नांची उत्तरे आपण दिली पाहिजेत, ते प्रश्न जनतेसमोर ठेवले पाहिजेत. पण राजकीय प्रचारसभांमधून आपण देशातील आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांवर टीका टिप्पणी करत आहात. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपण काय प्रकारची भाषा वापरली, त्यांच्याविषयी आपण उलट सुलट बोलता, पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा, अशा शब्दात काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शरद पवारांवरील टीकेचा पुण्यात समाचार घेतला.पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज (शुक्रवारी) दुपारी चार वाजता एसएसपीएमएस संस्थेच्या मैदानावर जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक घोषणांचा अर्थ जनतेला समजावून सांगत आगामी काळात काँग्रेस क्रांतिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. जातनिहाय जनगणना, निवडणूक रोखे, बेरोजगारी, संपत्तीच्या बाबतीत वाढती असमानता, माध्यमांची भूमिका आदी मुद्द्यांवर त्यांची मते मांडली.
नरेंद्र मोदी घाबरलेत, स्टेजवर रडूही शकतात, कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांची टीका

मोदीजी, पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा

नरेंद्र मोदींनी राजकारणाची चेष्टा करून ठेवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर उलट सुलट बोलत आहेत. पंतप्रधानांमध्ये थोडीतरी मर्यादा असायला हवी. पंतप्रधानांनी देशासमोरील गोष्टींची, प्रश्नांची जाण ठेवून भाषणे करायला हवी. परंतु देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर न बोलता ते ज्येष्ठ नेत्यांचा भाषणांमधून अपमान करत आहेत. शरद पवारांवर टीका करून तुम्हाला काय फायदा आहे? अशी टीका करून तुम्हाला काय मिळणार आहे? पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा, असे राहुल गांधी यांनी सुनावले.
मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून…; जयंत पाटलांकडून नरेंद्र मोदींना सणसणीत उत्तर

मराठा-धनगरांना आरक्षण देणार

इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार, ज्यामुळे मागास वर्गाला आरक्षण देण्याचा पर्याय खुला होईल. जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख, ठाकरेंचा पलटवार, म्हणाले- एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा…

पेपरफुटीतील आरोपींविरोधात आम्ही कडक कायदा आणणार

तसेच युवकांना पेपरफुटीचा त्रास होई नये म्हणून आम्ही खासगी यंत्रणांना परीक्षा घेण्याची कंत्राटे न देता सरकारी यंत्रणांद्वारेच परीक्षा घेऊ, असे सांगतानाच पेपरफुटीतील आरोपींविरोधात आम्ही कडक कायदा आणणार आहोत, असे वचन राहुल गांधी यांनी दिले.

निवडणूक रोख्यांवरून मोदी लक्ष्य

तसेच निवडणूक रोख्यांवरूनही राहुल यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. देशात कोरोनाचे थैमान सुरू होते. व्हेंटिलेटर ऑक्सिजनची कमतरता होती, त्यावेळी सत्ताधारी भाजप आणि मोदी तुम्हाला थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगत होते. कोरोनाची लस बनविणाऱ्या कंपनीने भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे दिले, हे जनतेसमोर आले आहे? एकीकडे कंपन्यांना कंत्राटे द्यायची आणि त्यानंतर काहीच दिवसांत परतफेड म्हणून संबंधित कंपन्यांनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी द्यायचा, अशी ‘क्रोनोलॉजी’ राहुल यांनी लोकांसमोर मांडली.

काँग्रेसची गॅरंटी

महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये, तरुणांना वर्षाला एक लाख देणारी नोकरी, ३० लाख रिक्त जागांसाठी भरती आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत रकमेसाठी कायदा ही काँग्रेसची गॅरंटी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी आवर्जून केला.