आपला स्ट्राइक रेट उबाठा सेनेपेक्षा उत्तम, महायुतीबद्दल निर्माण झालेले चुकीचे चित्र विधानसभेत पालटणार – मुख्यमंत्री

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठासेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या, तर आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के, तर आपला ४८ टक्के एवढा आहे. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर, ठाणे आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. असे असले तरीही महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

विधानसभेच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

१९ जून रोजी शिवसेनेच्या ५८व्या वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून त्याच्या तयारीच्या अनुषंगाने रविवारी पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे, पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा, असे निर्देश दिले.
Sanjay Raut : पॉलिटिकल एजंट म्हणणं भोवणार? संजय राऊतांवर कठोर कारवाई करा, भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची मागणी
यावेळी बोलताना शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चूका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. १९ जून या वर्धापन दिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या दुरुस्त करणे, तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्यास सांगितले.

‘उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट उत्तम’

या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठासेनेपेक्षा उत्तम होता. त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के, तर आपला ४८ टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा २ लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत, असे शिंदे म्हणाले. महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असेही स्पष्ट सांगितले.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असा खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे अशा खोट्या प्रचाराची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही असा, निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी केली.
Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार

हिंदू सण उत्साहातच साजरे करायचे

तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत असेही सांगितले. वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे. तसेच त्यांची सोय करावी, असेही आदेश दिले. तसेच गावागावात वाडी वस्तीवर शिवसेनेचे बोर्ड लागावेत, शाखा सुरू कराव्यात असेही सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात सरकारकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असून तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र त्यासोबतच पक्षानेही मोहिम राबवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन कामाला लागावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले.