आधी उमेदवारी अर्जावर आक्षेप, नंतर अर्ज वैध, नेमके काय घडले? वाचा…

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरुर : विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असे सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. डॉ. कोल्हे यांनी २०१६ मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवला. अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
आढळराव पाटलांचा फॉर्म भरायला मुख्यमंत्री नाही, मी पहिल्यापासून सांगतोय ते डमी उमेदवार : अमोल कोल्हे

डॉ. कोल्हे म्हणाले की, विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे. विरोधक बालिशपणाचे राजकारण करतायेत. पण असे राजकारण करुन काहीच उपयोग नाही होणार नाही. त्यांचे रडीचे डाव काही कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो. एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच मला घेऊन येणार, असे अमोल कोल्हे यांनी ठणकावून सांगितले. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याची टीका डॉ. कोल्हे यांनी केली.

घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत, म्हणून घड्याळाला मतदान करायचं नाही ; अमोल कोल्हेंची मतदारांना साद

२०१६ ला ओवेसींच्या सभेला केला होता विरोध

डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१६ ला पुण्यात होणाऱ्या ओवीसीच्या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी हा विरोध केला होता, आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यासंदर्भात डॉ. कोल्हे यांना कोणतीही कल्पना नव्हती, पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती. हीच बाब डॉ. कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केली.